मिरा-भाईंदर : स्वच्छ सर्वेक्षण २०२४–२५ मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर मिरा-भाईंदर महानगरपालिकेने आगामी स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ साठी स्वच्छता व्यवस्थेचा दर्जा अधिक उंचावण्याचे नियोजन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा यांनी बुधवारी शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा करत स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेतला.
या दौऱ्यात मिरा रोड रेल्वे स्थानक परिसर, जॉगर्स पार्क, हिंदू स्मशानभूमी नाला, सृष्टी परिसर तसेच जरीमरी तलाव या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. यावेळी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नालेसफाई तसेच सार्वजनिक सुविधांची स्थिती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. पाहणीदरम्यान काही ठिकाणी साचलेले बांधकाम अवशेष तात्काळ हटविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.