मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाच्या प्रत्येक माजी खासदार आणि आमदाराने पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील एक -एक मंडल दत्तक घ्यावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. प्रदेश कार्यालयात आगामी निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी झालेल्या माजी आमदार आणि खासदारांच्या बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. या बैठकीला ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील-दानवे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, संजय केनेकर, माधवी नाईक, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे आदी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती आखण्यात येत असून या बैठकीत संघटनात्मक स्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. बूथस्तरापासून मतदान केंद्रांपर्यंतची मोर्चेबांधणी, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, संपर्क मोहिमा यावर यावेळी भर देण्यात आला. कार्यकर्त्यांचा जोष, जनसंपर्क आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.