मुंबई – मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनचे सह्याद्री अतिथीगृह येथे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुनर्वसन प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि त्यातील अडचणीही जाणून घेतल्या.
सुमारे १ लाख कोटींचा या प्रकल्पाद्वारे धारावीमध्ये राहणाऱ्या सुमारे ६ लाख लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. धारावीतील विविध उद्योगांचे पुनर्वसन करण्यासाठी पाच वेगवेगळे क्लस्टर तयार करण्यात येणार असून त्याद्वारे मातीकाम, चामडे, अन्न, कपडे आणि कचरा पुनर्प्रक्रिया या उद्योगांचे पुनर्वसन करण्यात येईल. तसेच मेट्रो, रस्ते मार्ग, बस मार्ग, रेल्वे मार्ग याची उत्तम कनेक्टिव्हिटी असेल. सात वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून सर्व घटकांना उत्तम जीवनशैली मिळावी या उद्देशाने हा पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनिवास, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना आणि अदानी प्रॉपर्टीजचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.