नागपूर – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आरोग्यसेवा सुरु झाली. मुंबईत २५० पेक्षा जास्त दवाखाने सुरु आहेत. या आरोग्यसेवेचा विस्तारही ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर होतोय. काही ठिकाणी अर्धवट बांधकामे, प्रशासकीय अडचणी आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही या ठिकाणी भेटी दिल्या जात नाहीत. योजनेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर करूनही डॉक्टर्स-कर्मचारी अप्रशिक्षित आहेत. सरकारने ७०० दवाखाने सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवलेय. ते उद्दिष्ट कधीपर्यंत पूर्ण होणार असा प्रश्न भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी केला. त्याला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही सकारात्मक उत्तर दिले.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, आपला दवाखान्यांचा उपयोग झोपडपट्टीतील मध्यमवर्गीय रुग्णांना होतोय. त्यामुळे या दवाखान्यांची दुरावस्था व ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यापूर्ण करण्यासाठी जे काही उद्दिष्ट समोर ठेवलेय ते पूर्ण कधीपर्यंत करणार. आपला दवाखान्याची अर्धवट कामे राहिली असून स्टाफही नाही याचा एकत्रित विचार करून दर्जा कसा वाढविला जाईल याचा विचार होणे गरजेचे आहे. मोठ्या रुग्णालयात जाण्यापेक्षा छोट्या रुग्णांच्या सेवेसाठी आपला दवाखाना चांगल्या पद्धतीने काम करतात. शासनाच्या ज्या जागा आहेत त्या काही ठिकाणी दवाखान्यासाठी दिल्या जात नाहीत. याबाबत परिपूर्ण असा आराखडा करावा व या योजनेसाठी शासन सीएसआर मधून काही फंड उपलब्ध करून देणार का? असा प्रश्नही दरेकरांनी उपस्थित केला.
दरेकर यांच्या प्रश्नावर बोलताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले कि, राज्य सरकारची ही अतिशय महत्वकांक्षी योजना असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरु करण्यात आली आहे. ७०० पैकी आतापर्यंत सुरु झालेली केंद्र आहेत त्यापैकी केंद्रावर मॉनिटरिंग केले जातेय. सद्यस्थितीत ७०० पैकी सुरु झालेले दवाखाने सोडून ९६ दवाखाने जानेवारी २०२६ अखेरपर्यंत सुरु होतील. फार्मसीबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यानुसार स्टाफ आहे. फार्मसीस्टची मागणी केंद्र सरकारकडे करू, असे आश्वस्त केले.